महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता असताना, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सकारात्मक असल्याचे दिसत होते, विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती भाजप आणि शिंदे गटासाठी अडचणीची ठरली असती.
मात्र, गुरुवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये अचानक झालेल्या गुप्त भेटीमुळे राजकीय चर्चेला नवीन वळण मिळाले आहे. ही भेट पूर्वनियोजित नसल्याचं भासलं तरी ती आखून केलेली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज ठाकरे आधी हॉटेलमध्ये पोहोचले आणि 20 मिनिटांनी फडणवीस दाखल झाले. फडणवीस यांच्या अधिकृत कार्यक्रमात या भेटीचा उल्लेख नसल्यामुळे, या भेटीमागे राजकीय डावपेच असल्याची चर्चा आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, फडणवीस यांनी ठाकरे गट आणि मनसे युती रोखण्यासाठी ही रणनीती आखली असावी. या भेटीनंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात, यावर राज्यातील राजकारणाची दिशा ठरू शकते. भाजपचे नेते जरी सांगत असले की युतीचा त्यांच्या पक्षावर परिणाम होणार नाही, तरीही ही भेट भाजपने पुढाकार घेतल्याचे स्पष्ट संकेत देते.









